प्रति मा. आयुक्त दि. 29/10/2020
ठाणे, महानगरपालिका
ठाणे.
विषय:-बटरफ्लाय गार्डन वेळेवर उघडणे तसेच त्यातील अनेक त्रुटी दूर करणे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी ___
महोदय,
वर नमूद विषयाचे संदर्भात, ठाणे महानगरपालिकेने निसर्गाच्या सानिध्यात अतिशय सुंदर, भव्यदिव्य, असे बटरफ्लाय गार्डन उभारले आहे परंतु दुर्दैवाने त्याची कुठलीच देखभाल व्यवस्थित पणे केली जात नाही सदर गार्डनमध्ये अनेक त्रुटी असून दररोज येणारे निसर्गप्रेमी, व्यायाम करण्यासाठी येणारे, आपली सकाळ आनंदात घालवण्यासाठी येणारे, फोटोग्राफीसाठी येणारे, अश्या असंख्य वेगवेगळ्या वयोगटातील नागरिकांना सदर त्रुटींचा सामना करावा लागतो सदर पत्राद्वारे मी आपणास नम्र विनंती करते की खालील नमूद त्रुटींचा जर आपण 15 दिवसांच्या आत निपटारा केला नाही तर मग आम्हा सर्व गार्डन प्रेमींना ठाणे महानगरपालिकेच्या बाहेर ठिय्या आंदोलन छेडावे लागेल याची कृपया नोंद घ्यावी .
गार्डन मधील त्रुटी खालील प्रमाणे आहेत .
(१) गार्डन मध्ये लाखो रुपये खर्च करून सुलभ शौचालय उभारण्यात आले आहे परंतु दुर्दैवाने तेथे पाण्याची सोय नसून फक्त घाणीचे, दुर्गंधीचे, साम्राज्य पसरलेले आहे एकविसाव्या शतकात सुलभ शौचालय ची ही दुरावस्था म्हणजे ठाणे महानगर नगरपालिकेचे कौतुक करावे तितके थोडेच आहे असे वाटते. (माझे ठाणे स्वच्छ ठाणे ???? ) असो
(२) ठाणे महानगरपालिके द्वारे बसविण्यात आलेले व्यायामाचे साहित्य अक्षरशा कोसळून, कोलमडून पडले आहे. अनेक साहित्य तुटले आहेत. कृपया त्वरित त्याची डागडुजी करणे अन्यथा नवीन साहित्य बसविण्याची तसदी घेणे
(३) गार्डन मधील पायऱ्या तेथील पेव्हर ब्लॉक्स ठीक ठिकाणी उखडलेले आहेत त्यामुळे एखादे वयोवृद्ध नागरिक, गर्भवती महिला, किंवा लहान मूल यांचा अपघात होऊन काहीतरी अघटित घटना घडू शकते.(याला सर्वस्वी म.न.पा.च जबाबदार असेल, याची ही कृपया नोंद घ्यावी) तेव्हा कुणाच्याही जीवाशी न खेळता किंवा एखादी वाईट घटना घडल्यानंतर त्यातून शहाणपण घेण्याआधीच म.न.पा. ने त्वरित डागडुजी करवी.
(४) सदर गार्डन मध्ये कधीही सुरक्षारक्षक नसतो त्यामुळे येणाऱ्या नागरिकांवर कोणाचाही वचक किंवा अंकुश राहत नाही तेव्हा ज्यावेळेस गार्डन उघडे असेल त्यावेळेस तेथे किमान एका सुरक्षारक्षकाची उपस्थितीअसणे अनिवार्य आहे
(५) सदर गार्डन उघडण्याची व बंद करण्याची एक ठराविक वेळ निश्चित व्हायला हवी सदर गार्डन हे सुरक्षारक्षकांच्या सोयीप्रमाणे, इच्छेप्रमाणे, उपलब्धते प्रमाणे उघडले व बंद केले जाते यामुळे तेथे येणाऱ्या नागरिकांना सकाळी सकाळी गैरसोयीला सामोरे जावे लागते
(६) सदर गार्डनमधील पालापाचोळा कधीही वेळेवर साफ केला जात नाही तेथील झाडांची योग्य प्रकारे निगा राखली जात नाही रस्त्यावर दुतर्फा पालापाचोळा पडलेला असतो त्यातूनच मार्ग काढत सदर गार्डन मध्ये नागरिक चालत जात असतात त्यावर पाय घसरून तर बिचारे अनेकदा पडतात जखमी ही होतात आणि त्यानंतर गार्डनमध्ये येणेच बंद करतात.
(७) सदर गार्डन मध्ये येणाऱ्या नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करावी.
तेव्हा सदर पत्र मिळाल्यानंतर पंधरा दिवसाचे आत आपण माझ्या पत्रावर काय योग्य ती कारवाई करत आहात ?? ते मला लिखित स्वरूपात कळविण्यात यावे हीं नम्र वनंती.अन्यथा नाईलाजास्तव मला आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल.
आपणाकडून त्वरित कृतीची अपेक्षा आहे .
सहकार्याबद्दल धन्यवाद !!!
आपली नम्र
के.वृषाली
[protected]
[protected]
Was this information helpful?
Post your Comment