एस.टी. प्रवाशांच्या सेवेसाठी की प्रवाशांना लुटण्यासाठी......
प्रवाशांच्या सेवेसाठी असं ब्रीदवाक्य अभिमानानं मिरवणारी एस. टी. आता खरंच प्रवाश्यांच्या सेवेसाठी आहे का हा प्रश्न पडावा असा किस्सा परवा मी अनुभवला. मी 27 मे रोजी सोलापूरहून सांगलीला येत होतो. रात्रीचे साधारण 10.30 वाजले होते. सांगोल्याच्या अलिकडे रेडिएटर गरम होऊन बस बंद पडली. एका प्रवाशाने धावाधाव करुन पाणी आणलं. ते रेडिएटरमध्ये टाकून गाडी सुमारे पाऊण तासाने सुरु केली. सांगोला बस स्थानकावर चालक वाहकांनी छान पोटभर जेवण केले पण, डेपोत जाऊन गाडी दाखवली नाही. जेवण झाल्यावर गाडी निघाली आणि शिरढोण जवळ आल्यावर पुन्हा रेडिएटर गरम होऊन बंद पडली. यावेळी रात्रीचे साधारण 1.30 वाजले होते. थोडावेळ थांबून प्रयत्न केला, पण गाडी सुरु झाली नाही. शेवटी मागून आलेली आंबेजोगाई डेपोची कोल्हापूर गाडी थांबविण्यात आली. पण या गाडीच्या वाहकाने डे ची गाडी आणि नाईटची गाडी असा विषय करत प्रवाशांना गाडीत घेण्यास नकार दिला. यायचे असेल तर फरकाच्या रक्कमेची तिकीटं घ्यावी लागतील असं अडवणुकीचं धोरण स्वीकारलं. खूप वाद झाला. पण शेवटी त्यानं फरकाच्या रक्कमेची तिकीटं घ्यायलाच लावली. या घटनेनं माझ्या मनात काही प्रश्न निर्माण झाले.
१) सोलापूर ते सांगली हे अंतर दिवसा आणि रात्री बदलत नाही. एस.टी.ची बस ही दिवसासाठी वेगळी आणि रात्रीसाठी वेगळी नसते. मग दिवसा आणि रात्रीसाठी वेगळे वेगळे दर का असतात ? ही प्रवाशांची सेवा आहे की प्रवाशांची लूट आहे ?
२) दिवसाची बस बंद पडली यात प्रवाशांचा काय दोष ? त्यांनी जादा पैसे का मोजायचे ?
३) बस नादुरुस्त झाली तर प्रवाशांना पुढील प्रवासाची सोय करुन देण्याची जबाबदारी कुणाची ? रात्रीच्या वेळी ही सोय करणे महत्वाचे की जादा दराची तिकीटे काढा म्हणून अडवणूक करणे ?
या प्रश्नांची उत्तर मला मिळाली नाहीत. पण इतकं नक्की की या घटनेन एक मात्र झालं की, प्रवाशांच्या सेवेसाठी असणारी एस.टी आता तशी राहिली नाही. ती व्यवसायिक झाली आणि आता प्रवाशांना लुटायला लागली का ? असा प्रश्न मला सतत सतावू लागला आहे. Was this information helpful? |
Post your Comment